मुंबई, दि.१ :- १०वी आणि १२वी मध्ये रात्रशाळांमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आमदार कपिल पाटील आणि ज्येष्ठ संपादक राही भिडे यांच्या उपस्थितीत बुधवार दि. ३१ जुलै रोजी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती विद्यार्थी संघटना यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबईतून रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा गौरव यावेळी करण्यात आला.
बहुजन वर्गातील मुलांसाठी रात्रशाळा हे एक वरदान ठरले आहे. दिवसभर काम करुन रात्री ही मुलं शाळेत शिकत आहेत. त्यांच्या जिद्दीला व चिकाटीला सलाम. बहुजन वर्गातील मुलांच्या शिक्षणासाठी रात्रशाळा टिकल्या पाहिजेत, असं मत यावेळी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केलं.
ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांनी सुद्धा यावेळी बोलताना रात्रशाळेचे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थी, शिक्षकांचं कौतुक केलं. सोबतच छात्रभारती विषयी बोलताना, देशभरातील सर्व विद्यार्थी संघटना पक्षीय राजकारण करत असताना छात्र भारती आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे हे विशेष. रस्त्यावर उतरून लढणारी ही एकमेव विद्यार्थी संघटना राहिली आहे, याची मी साक्षीदार आहे. असे त्यांनी सांगितले.
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत रात्रशाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी व्यक्त केले.
माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात उलट सुलट निर्णय घेऊन रात्रशाळा संकटात टाकल्या. तरीसुद्धा आमचे रात्रशाळेचे विद्यार्थी दिवसा काम करुन रात्री शाळेत जाऊन चांगले गुण मिळवत आहेत. त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक संघ रात्रशाळा वाचवण्यासाठी प्रतिकुल परिस्थिती लढत आहे. या लढ्यात छात्र भारती नेहमीच सोबत असेल, अशी भूमिका छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी मांडली.
या कार्यक्रमाला आर्किमिडीज अॅकॅडमीचे अरुण लावंड, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे सुरेश कोकितकर, संगिता कदम, शिवाजी खैरमोडे, दिनेशकुमार त्रिवेदी, छात्र भारतीचे सागर भालेराव, अॅड. सचिन बनसोडे, सचिन काकड, विकास पटेकर, दिपाली आंब्रे, जितेश किर्दकुडे, अनिकेत उदडे यांच्यासह मुंबईतील रात्रशाळेतील विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळू राऊत प्रतिनिधी