नीरा नरसिंगपूर: दि १८ :- निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन 2 हजार 601 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने एफआरपीची रक्कम रु. 2473 शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. आता उर्वरित ऊस बिलाचा अंतिम हप्ता रु.128 लवकरच शेतकऱ्यांचे बँक खात्यात वर्ग केला जाईल,अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज(दि.18) दिली.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2018-19 ची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.18) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. तसेच सदर अंतिम हप्त्या बरोबर मागील गळीत हंगाम सन 2017-18 मधील देय रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
सन 2018-19 च्या हंगामात कारखाने ऊसाचे 520170 मेट्रिक टन गाळप केले.या हंगामात शेटफळ- हवेली तलावाच्या लाभक्षेत्रातील गावांमधील पाण्याअभावी जळालेला ऊस कारखान्याने प्राधान्याने गाळप केला. शिवाय कारखाना कार्यक्षेत्रातील इतर भागातील पाण्याअभावी जळालेला उसाचेही लवकर गाळप केले.त्यामुळे साखर उतारा घटून कारखान्याला सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले.मात्र पाण्याअभावी जळालेल्या ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम हे नीरा भीमा कारखान्याने केले आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सभेत बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारचे इथेनॉल धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 6 हजार कोटीचे पॅकेज तयार केले आहे.आगामी काळात साखर उद्योगाला इथेनाॅल धोरण हे निश्चितपणे तारेल.
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी बोनस दिला जाईल, संचालक मंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. नीरा-भीमा कारखान्याची स्थावर मालमत्ता रु.334 कोटीची झाली आहे.तसेच आगामी सन 2009-20 चा गळीत हंगाम दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नीरा-भीमा कारखान्याचे देऊन सहकार्य करावे.आपणा सर्वांच्या सहकार्याने आगामी गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल,असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान,इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी मिळत नसल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती आगामी काळात सुजलाम सुफलाम होईल,असा माझा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी वार्षिक सभेचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले.प्रास्ताविक व अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक धिरजकुमार माने यांनी केले.यावेळी सर्व विषयांना खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूरी देण्यात आली.
यावेळी अॅड.कृष्णाजी यादव, नानासाहेब शिंदे,प्रशांत पाटील,उदयसिंह पाटील,मयूरसिंह पाटील,विलासराव वाघमोडे, अनिल पाटील, विकास पाटील, किरण पाटील, श्रीमंत ढोले, देवराज जाधव, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, मंगेश पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रसाद पाटील, रणजित रणवरे,सुरेश मेहेर, महादेव घाडगे,तानाजीराव देवकर,राजेंद्र कोरटकर, प्रतापराव पाटील,अजिनाथ बोराडे, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, विश्वासराव काळकुटे, संजय बोडके, प्रकाश मोहीते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, अशोक वनवे, नागेश नष्टे,मोहन गुळवे, तानाजी नाईक, राजकुमार जाधव, कैलास हांगे, सुधीर पाटील,उमेश सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते. सुञसंचालन अमर निलाखे तर आभार कारखान्याची उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी