मुंबई दि ०६ : – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन ब्रिज कोकणाला महाराष्ट्राशी जोडणारा १९० वर्षे जुना पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टीमने घेतलेल्या अथक मेहनतीमुळे अतिशय आव्हानाचा असलेला ब्रिज रविवारी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आला. अनेक आव्हानांचा सामना करत हा ब्रिज जमीनदोस्त करण्यात आला.या ब्लास्टिंगनंतर एकूण १२०० ट्रक इतका मलबा तयार झाला आहे. काही टप्प्यात हा मलबा याठिकाणाहून हटवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली. हा संपूर्ण मलबा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येईल. येत्या चार दिवसांमध्ये हा मलबा हटवण्यात येईल. त्यानंतर येत्या पंधरा दिवसात अतिरिक्त अशी तिसरी काँक्रिटची लेन तयार करण्यात येणार आहे. या ब्रिजमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.
या संपूर्ण ब्रिजमध्ये एकुण पाच पिलर्स होते. प्रत्येक पिलरसाठी सरासरी ४० ड्रिल करण्यात आले. त्यानुसार २०० हून अधिक ड्रिल करत हे कंट्रोल ब्लास्ट करण्यात आले. त्यासाठी तज्ञांची टीमही आमच्यासोबत होती. जुना ब्रिज पाडताना नवीन ब्रिजला धोका पोहचणार नाही याचीही दक्षता या कामादरम्यान घेण्यात आली.त्यामुळे ब्लॅक स्पॉट म्हणून या ब्रिजची ओळख झाली होती. संपुर्णपणे दगडाचा असा ब्रिज १९० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. त्यामध्ये काँक्रिट कुठेही वापरण्यात आले नव्हते. त्यामुळे ब्लास्टिंग दरम्यान नेमकी आणि मजबुत अशी स्फोटके ठेवण्यासाठीची जागा ड्रिल करणे हे एमएसआरडीसी समोरील एक आव्हान होते. दगडाचे बांधकाम असल्याने अनेक ठिकाणी वारंवार ड्रिल करावे लागले. प्रत्येक पिलरला समोरून ड्रिल करून कंट्रोल ब्लास्टिंग करण्यात आले. काही ठिकाणी पोकळ जागाही सापडल्या त्यामुळे ब्लास्टिंगसाठीची आव्हाने होती, अशी माहिती अनिल गायकवाड यांनी दिली.
ब्रिटिशकालीन ब्रिज खालील द्रुतगती मार्गावर वळण आणि रुंद रस्ता असल्यानं या परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. हा भाग अपघात प्रवण क्षेत्रच बनल्यानं अखेर प्रशासनाने तो पाडण्याचा निर्णय घेतला.हा पूल पाडण्याचं आधीपासून नियोजन सुरु होतं, मात्र इतरवेळी वाहनांच्या गर्दीमुळे अडचण येत होती. अखेर लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग करुन हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. स्फोटानंतर मुंबई-पुणे महामार्गावर सर्वत्र मलबा आणि राडारोडा दिसत होता. यानंतर प्रशासनाने रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरु केलं आहे. या पुलाचे उर्वरित अवशेष देखील पाडण्याचं काम सुरु आहे.4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यानच्या काळात हा संपूर्ण पूल हटवण्याचं काम सुरु राहणार आहे. यासाठी यापुढेही स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे लेनवरील वाहतूक अंडा पॉईंट येथून जुन्या मार्गावरून खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळा एक्झिट या द्रुतगती मार्गावर नेण्यात आली आहे. तर मुंबई लेनवरील वाहतूक लोणावळा एक्झिट येथून बाहेर पडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन लोणावळा-खंडाळा शहरातून अंडा पॉइंटपर्यंत वळवण्यात येणार आहे. म्हणजेच द्रुतगती मार्गावर एकूण 10 किलोमीटर अंतरासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत