कर्जत दि.२६ :-‘मला माझे पैसे दे, नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे’ असा सावकाराने तगादा लावला परंतु,रक्कम दिल्यानंतर माझी जमीन पुन्हा नावावर करून द्यावी लागेल या बोलीवर एक एकर जमीन सावकाराच्या नावावर करूनही दिली.मात्र गेली वर्षभरापासुन तक्रारदार पैसे देण्यास तयार असतानाही आपली मानसिकता बदललेला सावकार जमीन माघारी देण्यास तयार नव्हता.आता या सावकाराची मानसिकता कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादवांमुळे जाग्यावर आली असुन त्याने आपल्या नावे करून घेतलेली जमीन पुन्हा तक्रारदाराला परत करून दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील बाळासाहेब पांडुरंग भोगे या शेतकऱ्याने एका सावकाराकडुन सन २०१७ साली २ लाख ५० हजार रुपये अडीच रुपये टक्के प्रतिमाहिना व्याजदराने घेतले होते.मात्र भोगे यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कम सावकाराला देता आली नाही.सावकाराने ‘माझे पैसे दे नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे’ असा तगादा लावला. त्यानंतर नाईलाजास्तव बाळासाहेब भोगे यांनी ‘पैसे दिल्यानंतर माझी जमीन मला परत देण्यात यावी’ या बोलीवर एक एकर जमीन सावकाराच्या नावे करून दिली.सावकार त्यातील उत्पन्न घेत होता,परंतु मागील वर्षापासुन बाळासाहेब पांडुरंग भोगे हे सावकाराकडुन घेतलेली पुर्ण रक्कम देण्यास तयार असुन देखील सावकार जमीन परत देण्यास नकार देत होता.’मला जमीन विकायची आहे,तुला जर हवी असेल तर आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतील तरच मी तुला ती जमीन परत देईल’ असे सावकार म्हणत होता. संबंधित जमिनीची आजच्या बाजारभावाप्रमाणे एकरी ९ ते १० लाख रुपये किंमत होत असल्याने एवढी रक्कम देणे फिर्यादीस शक्य नव्हते. वैतागलेल्या बाळासाहेब पांडुरंग भोगे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीगत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगितली.यादव यांनी सर्व घटना समजुन घेत लागलीच सावकाराला बोलावून घेतले.’तु फिर्यादीकडुन घेतलेली जमीन त्यांना परत कर नाहीतर, तुझ्यावर सावकारी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल होईल’ असे पोलिस निरीक्षकांनी पोलीशी खाक्यात सांगितल्याने सावकार भानावर आला. अडीच लाख रुपये मुद्दलीची रक्कम घेऊन एक एकर जमीन परत देण्यास त्याने होकार दिला.दि.१६ रोजी सावकाराने फिर्यादीची जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करून दिली आहे.
आभार मानताना अनेकांना अश्रु अनावर!
आपल्या हक्काची जमीन आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही अशा चिंतेने ग्रासलेल्या भोगे या गरीब कुटुंबाला जमीन परत मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे.सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दिलेल्या उपक्रमशील पोलिस निरीक्षकांच्या कामाने खऱ्या अर्थाने गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे.त्यांचे आभार मानताना अनेकांना आपले अश्रु अनावर होत आहेत
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे