पुणे दि ०५ :- कोरोना महामारीमुळे जवळपास ७ महिने कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांची भ्रांत, थकलेले हप्ते आणि निराशा यामुळे या क्षेत्रातील अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.
सरकारदरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी, तसेच कार्यक्रम चालू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, सोमनाथ धेंडे, शिरीष पाठक, सूर्यकांत बंदावणे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
बबलू रमझानी म्हणाले, “इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. आम्हाला कोणतीही आर्थिक मदत नकोय, केवळ आमचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. त्यातून आमची उपजीविका भागू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या बँक कर्जाचे हप्ते भरण्यास शिथिलता द्यावी, कारण आमचे व्यवसायला अजून परवानगी नसून आम्ही बँकेच्या हफ्ते भरणार कुटून हा एक मोटा प्रश्न आमच्या समोर सध्या निर्माण झालेला आहे,वाहतुकीसंदर्भात गाड्यांचे पासिंग, इन्शुरन्स, कर भरणा याबात सवलत मिळावी. सर्व तंत्रज्ञाना कलाकाराचा दर्जा मिळावा . व्यावसायिकांना त्यांच्या मुलांच्या शाळा व कॉलेजच्या फीसमध्ये सवलत मिळावी. व्यावसायिकांना आपले साहित्य ठेवण्यासाठी महापालिका हद्दीत जागा किंवा गाळे नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावेत. तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा. कलाकार, तंत्रज्ञ कल्याण मंडळांची स्थापना करावी, यापुढे असे होऊ नये आणि, तसेच आमच्या व्यवसायाशी निगडीत असलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे. आमच्या मागण्या आहेत.”
शिरीष पाठक म्हणाले, “इव्हेंट्सशी संबंधित पुण्यात १० हजार व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिकाकडे १० ते ५० कामगार आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या १० ते १२ लाख इतकी आहे. लग्न समारंभ, गणेशोत्सव यासह इतर अनेक कार्यक्रमांचा सिझन गेल्या सहा महिन्यात होऊन गेला. त्यात ५० ते ६० कोटीची उलाढाल झाली असती. परंतु, कोरोनामुळे हे सगळे व्यावसायिक घरात बसून असल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.” शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हा तंत्रज्ञ-कलावंतांना न्याय द्यावा, असे आवाहन सोमनाथ धेंडे यांनी केले.