मुंबई दि १७:- पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणात आलेल्या क्षेत्रात दिनांक २० एप्रिलनंतर आवश्यक कामांसाठी लॉकडाऊनमधून सवलती देण्याची घोषणा केली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांना या सवलतीचा लाभ होण्याची अपेक्षा असून राज्य सरकारने त्याची तयारी आतापासूनच करावी व जिल्ह्याऐवजी प्रत्येक तालुक्याचा विचार करून अधिक बारकाईने नियोजन करावे, अशी सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केली. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या सोईसाठी या नियोजनात विशेष भर द्यावा, असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले असून त्यामध्ये सूचना केल्या आहेत. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनांक १४ एप्रिल रोजीच्या भाषणानंतर देशातील नागरिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही किंवा तो आटोक्यात आहे, असे अनेक जिल्हे आहेत. तेथे आवश्यक कामांसाठी २१ एप्रिलपासून सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने तातडीने नियोजन करावे. ते अधिक प्रभावी होण्यासाठी तालुकानिहाय याद्या तयार कराव्यात. कोरोनाचे संकट नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्व काळजी घ्यावी लागणार आहे. नियोजन करताना त्या दृष्टीने प्रतिबंधक उपाय करावेत.
त्यांनी सांगितले की, कोरोनाची साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नागरिक अडकले आहेत. ही साथ आटोक्यात आलेल्या क्षेत्रातील निर्बंध कमी झाल्यानंतर हे नागरिक आपापल्या गावी परतण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने जेथे शक्य आहे तेथे त्यांच्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था करावी. प्रवाशांनी मास्क अथवा फेस कव्हरचा वापर करणे सक्तीचे, प्रवाशांमध्ये योग्य अंतर राहण्यासाठी एका सीटवर एक प्रवासी, बसमध्ये प्रवेश करताना व बाहेर पडताना सॅनिटायझरची सुविधा, चालकांना संरक्षणासाठी किट, गावी पोहोचलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी आणि आवश्यक त्यांचे विलगीकरण करणे अशी खबरदारी राज्य सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.
ते म्हणाले की, राज्यात ऊसतोड कामगार आणि मजूर रोजगारानिमित्त इतर जिल्ह्यात अडकले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये सवलत मिळेल तेथे त्यांना पोहचविण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या प्रवासात कोरोनासंबंधी सर्व प्रतिबंधक उपाय करावेत तसेच या कामगार व मजुरांना उदरनिर्वाहासाठी एक महिन्याचे रेशन धान्य आणि प्रतिदिन साठ रुपये भत्ता द्यावा.अन्य राज्यातील जे कामगार अडकले आहेत, त्यांना आपल्या घरी जाता यावे यासाठी त्यांचे सध्याचे राहण्याचे ठिकाण, ज्या जिल्ह्यात जायचे आहे तो जिल्हा व मार्गातील क्षेत्रामध्ये प्रवासाची सवलत असणे गरजेचे आहे. ही बाब गुंतागुंतीची असली तरी राज्य सरकारने त्या दृष्टीने आतापासून केंद्र सरकार व अन्य राज्य सरकारांशी चर्चा करून उपलब्ध सवलतीत काय करता येईल, याचाही आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.