मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्क्यानं, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून श्री. सतिश चव्हाण हे ५८ हजार मताधिक्क्यानं विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक असल्याचे सांगून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.