पुणे, दि.२१:- पुणे शहरातील बाणेर परिसरात बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी सव्वापाच लाखांचा ऐवज चोरी केला.ही घटना बाणेर येथील विरभद्रनगरमध्ये घडली असून हा प्रकार शुक्रवारी (दि.20) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बाणेर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विनय विठ्ठल ताम्हाने (वय-28 रा. फ्लॅट नं. 202, भक्ती अॅम्बीयन्स, लेन नं. 8, विरभद्रनगर, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते साडेतीन या दरम्यान घडला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय ताम्हने हे घराला कुलूप लावून ताथवडे येथील एका समारंभासाठी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते.या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील बेडरुमधील लाकडी कपाटातील सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम चोरुन नेली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास विनय हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुमधील समाना अस्ताव्यस्त पडले होते.घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.चोरट्यांनी घरातील 4 लाख 89 हजार रुपये किमतीचे 148 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 12 हजार रुपयांचे चांदीचे दागिने, 17 हजार रुपये रोख असा एकूण 5 लाख 18 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.पुढील तपास सहा.पो.निरी . एस.डी.पवार , करीत आहेत.