नीरा नरसिंहपूर :दि.२३ :- भाजप नेते,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसिल कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे मंगळवारी (दि.25) दुपारी 12 वा. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्क्रिय शासनाविरुद्ध धरणे आंदोलन होणार आहे,अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे व इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी आज रविवारी दिली.भारतीय जनता पार्टीचे राज्यव्यापी धरणे आंदोलन असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व महिलांविरुद्ध वाढते अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय महाआघाडी शासनाविरुद्ध हे आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी दिलेले होते, मात्र संपूर्ण कर्जमाफी सोडाच, दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची रक्कम अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळालेली नाही. तसेच अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना रू. 25 हजार व फळबागांना 50 हजार प्रतिहेक्टरी मदत देऊ असे महाआघाडी सरकारचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर सांगत होते. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेल्या रु. 8 हजार मदतीमध्ये या सरकारने 1 रुपया देखिल वाढ केलेली नाही. अशाप्रकारे महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे शेंडे व सय्यद यांनी सांगितले.तसेच राज्यात हिंगणघाट सारख्या घटना घडून महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत, मात्र हे सरकार आपसातील मतभेद मिटवण्यात वेळ घालवत आहे. महिलांच्या अत्याचाराकडे लक्ष देण्यास व अत्याचार होऊ नये म्हणून पावले उचलण्यास सरकारला वेळ नाही. अशाप्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या महाआघाडी सरकारचा निषेध करण्यासाठीच्या धरणे आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे व शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी केले आहे.
इंदापूर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार