मुंबई दि. ०७ :- . नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कलंब मार्केट मध्ये आवश्यक फळे भाजीपाला ची आवक झाली आहे तसेच राज्यातील सहा महसूल विभागात किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची व औषधांची आवक व्यवस्थित सुरू आहे कुठे ही अन्न धान्य वस्तूंचा , फळभाजीपाला आणि औषधांचा तुटवडा नाही असे शासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आज नवी मुंबई वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 183 गाड्या भाजीपाला, 96- वाहने कांदे, बटाटे आणि 318- वाहने फळे दाखल झाली. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरातून 324 गाड्यातून भाजीपाला व फळांचा पुरवठा करण्यात आला.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 612 टेम्पू आणि छोट्या वाहनातून थेट शहराच्या विविध केंद्रावर फळे आणि भाजीपाला विक्री करण्यात आला.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि उपनगरातील बाजार समिती आवारात भाजीपाला विक्रीचे काम सुरळितपणे सुरु आहे. या कामकाजात सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे नॉर्मस पाळले जात आहेत.
गुलटेकडी आणि मोशी, मांजरी, खडकी येथील उपबाजार समितीमध्ये एकूण 467 वाहनामधून कांदे, बटाटे आणि भाजीपाला आवाक झाली. ही आवक सुमारे 10 हजार क्विंट्टल इतकी आहे.
नागपूर – कलंब येथील मुख्य मार्केट यार्डात 185 वाहनातून भाजीपाला, कांदे, बटाटे, लसून तसेच फळे यांची आवक झाली.
राज्यातील प्रमुख शहरात भाजीपाला व फळे यांची आवक सुरळितपणे सुरु आहे. असे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी किराणा दुकान असोसिएशन व मेडिकल असोसिएशन यांच्या संपर्कात असून किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत राहवा या साठी सतत प्रयत्नशील आहेत.सध्या सर्वत्र किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू चा पुरवठा शंभर टक्के आहे.