पुणे दि ३१ :- कोरोनावरची लस आलेली असली तरी अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. जुन्नर तालुक्यातील लेण्यांद्री कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, परिचारिका तसेच तेथील कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कृषी तज्ञ रश्मीकुमार अब्रोल, सामाजिक कार्यकर्त्या माई सावर्डेकर, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला शेवाळे, अनिल सातकर, काव्यमित्रचे राजेंद्र सगर उपस्थित होते.

यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा विशेष गौरव, राज्यस्तरीय संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार वितरण आणि काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांच्या हस्ते कोविड सेंटरचे डॉ. यादव शेखरे, नवनाथ पानसरे तसेच सुवर्णा ढोबळे, पूनम तांबे, सरिता कलढोने, छाया वाळुंज, सुनिता वामण यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार श्रीराम महाजन, संजय जगताप, संदिप वाघोले, सुभाष कुरंदळे, बाबासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हा माहिती अधिकारी सरग म्हणाले, गेल्या वर्षी 9 मार्चला पुण्यात पहिली कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आली. त्यानंतर आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल, पत्रकार या सर्वांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरावं लागलं. लॉकडाऊन (टाळेबंदी), कंटेनमेंट झोन (प्रतिबंधात्मक क्षेत्र) अशा अनेक नव्या शब्दांशी आपली ओळख झाली. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे आपल्या जीवनशैलीचा भाग झाले. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले, प्रतिबंधात्मक लस आली असली तरी धोका टळलेला नाही, याचे सर्वांनी भान ठेवावे, असेही ते म्हणाले.

उज्ज्वला शेवाळे यांनीही कोरोना काळात डॉक्टर्स तसेच पोलीस विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. कोरोनाची जनसामान्यात प्रचंड भीती होती, ती कमी करण्यासाठी विविध विभागांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी बालशिवाजी आणि जिजाऊमातेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजेश दिवटे यांनी केले. ‘यशवंती’ संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या कामाची त्यांनी माहिती दिली.

कविसंमेलन-
रश्मी ग्रीनलँड पर्यटन केंद्र येथे निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यामध्ये डॉ. शकील जाफरी, गणेश पुंडे, आनंद गायकवाड, प्रभू जाचक, भागवत काटंबे, राजेश दिवटे, विलास कसबे यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी आकाराम कवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले. रश्मीकुमार अब्रोल, आकाराम कवडे, राजेंद्र सरग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधा राजेश दिवटे, तुकाराम गुंटे, नरहरी गरुड यांनी परिश्रम घेतले.