.मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचे ‘भा’ पण शिल्लक उरला नसता आशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कृतीचा धिक्कार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा आज पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झाला. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे, आ. सतीश चव्हाण, माजी आमदार संजय वाघचौरे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा ही भूमी संतांची आहे, महापुरुषांची भूमी आहे. आमच्या महापुरुषांचा अपमान इथे सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी २०१४ साली शिवछत्रपतींचा आशिर्वाद चला देवू मोदींना साथ अशी घोषणा दिली होती. मात्र आज पाच वर्षांनंतर जेव्हा मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा साधा उल्लेखही नाही. ना त्यांच्या स्मारकाची वीट रचली गेली. हा आमच्या महाराजांचा अपमान आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फोडण्याचे काम भाजप शिवसेना करत आहे. इतके नीच राजकारण कधी महाराष्ट्रात घडले नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप असताना बबनराव पाचपुते, विजय गावित यांना भाजपात घेतले. भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना हे कसं पचते ? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्या असे आव्हान दिले.
आपले मुख्यमंत्री प्रचंड खोटारडेपणा करत आहेत. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडने जोडणार असे आश्वासन दिले होते. पण आजूनही ते काम काही झाले नाही. आणि त्यामुळेच भीषण दुष्काळास सामोरे जाण्याची पाळी लोकांवर आली. आघाडी सरकार असताना दादा मराठवाड्यासाठी धावून यायचे याची आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली.
बाळू राऊत प्रतिनिधी