पुणे, २९ जून : मान्सूनच्या आगमनानंतरही पुणे व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने, आता पुणे महापालिकेकडून या सर्व भागात कृत्रिम पाऊस पाडता येईल का याबाबत चाचपणी सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सूचना दिल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणती संस्था काम करते, याचा किती फायदा होईल याबाबत माहिती घेऊन तपशील लवकर सादर करण्याबाबत प्रशासनास सांगण्यात आले आहे.
सध्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात केवळ ३.६० टीएमसी पाणी साठा असून तो केवळ पुढील दोन महिने पुरेल एवढाच आहे. दरम्यान आता भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भगत म्हणजे शहराच्या पूर्व भागातही पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळा येत्या ९ व १० जुलै रोजी पुण्यात मुक्कामी आहे. या दोन दिवसांसाठी शहरातील पाणी कपात स्थगित करण्यात येणार असून, दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
——
महापालिकेच्या दर्शनी भागात अजित पवार यांचे तैलचित्र
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र महापालिकेच्या मुख्य इमारतीत दर्शनी भागात लावण्यावर पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पवार यांच्या जयंती पूर्वी म्हणजे २२ जुलै पूर्वी हे तैलचित्र लावण्यात येणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
—–
यंदाची वारी सेवा वारी
आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असताना सर्वच स्तरातून वारकऱ्यांची सेवा केली जाते. यावर्षी पुणेकर नागरिकांनी महापालिकेच्या सेवकांबरोबर खांद्याला खांदा देऊन सेवा करावी असे आवाहन महापौर यांनी केले आहे. यावर्षी सेवा वारी हा उपक्रम महापालिका राबविणार असून, त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
या उपक्रमात शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याचबरोबर महिला वारकऱ्यांना पुणेकरांनी आपल्या सोसायटीच्या आवारातील तसेच घरातील स्वच्छता गृहे उपलब्ध करून द्यावीत विशेषतः पेठांमधे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
सेवा वारीत यावर्षी पालखी पुणे मुक्कामी असताना १० जून ला सामूहिक पसायदान घेण्यात येणार आहे. यात सर्व पुणेकर व वारकरी एकाच वेळी पसायदान पठण करतील. याबाबत महापालिकेने देहू व आळंदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून वेळ लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
——
नसरापूर प्रकरणी अवघ्या ५५ दिवसात आरोपी ला फाशीची शिक्षा सूनविण्यात आली. या प्रकरणात जलद गतीने तपास व कार्यवाही केल्याने देशात प्रथमच एवढ्या लवकर आरोपी ला शिक्षा दिली गेली. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व गृह खाते यांच्या अभिनंदन ठराव पक्ष नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.



























