पुणे दि.०३ : -अवकाळी पावसामुळे पुणे विभागात अंदाजे 1 लाख 36 हजार 148 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून येत्या पाच दिवसात पंचनाम्याचे काम पुर्ण होईल आणि लवकरात लवकर शेतक-यांना
मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
आपण दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्हयाचा दौरा केला. नुकसान झालेल्या शेतीपिकाची पाहणी केली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, सांगली जिल्हयात 65 हजार 267 हेक्टर, सोलापूर जिल्हयात 36 हजार 345 हेक्टर, पुणे जिल्हयात 21 हजार 681 हेक्टर, सातारा जिल्हयात 11 हजार 800 हेक्टर व कोल्हापूर जिल्हयात 1 हजार 55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्हयांचे प्रामुख्याने सोयाबीन, भात, जवारी, द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुणे विभागात एकूण 51 तालुके बाधित असून एकूण 1 लाख 36 हजार 148 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्हयातील काही भागातील गावांना भेटी देत आपण पाहणी केली असून या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, हे पंचनामे करत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधीत झाले आहे, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकाचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेवून त्या शेतक-यांचे पंचनामे करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतक-याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपनीचे प्रतिनिधी,जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतल्याचे सांगून पुणे विभागात आजअखेर सरासरी 137.24 टक्के इतका पाऊस झाला असून सर्वाधिक 182.5 टक्के पाऊस सांगली जिल्हयात झाला आहे. पुणे जिल्हयात 158.5 टक्के, सातारा जिल्हयात 170.86 टक्के, सोलापूर जिल्हयात 91.75 टक्के तर कोल्हापूर जिल्हयात 120.24 टक्के इतका पाऊस झाला असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले