मुंबई, दि. २० फेब्रुवारी २०२६ : इंग्लंडमधील वेल्स संसद (सिनेड) येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधीमंडळाने दिलेल्या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शाश्वत विकास आणि भविष्योन्मुख धोरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले.
आपल्या समारेपाच्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या काही दशकांमध्ये जग मोठ्या वेगाने बदलले आहे. १९४४ ते १९९० या कालखंडात लोकशाही, विकास आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न झाला; परंतु १९९० नंतर जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील झपाट्याने वाढ, स्थलांतर आणि अस्मितांच्या राजकारणामुळे जगाचे स्वरूप बदलले. सहस्त्रक विकास उद्दिष्टांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांपर्यंतचा प्रवास हा मानवकेंद्री विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये ‘फ्युचर कमिशनर’ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतातही २०४७ पर्यंतचे विकास ध्येय निश्चित करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारांकडून त्याचा कालांतराने आढावा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत विशेष आग्रह धरला असून दरवर्षी भारत सरकारकडून शाश्वत विकास उद्दिष्टे अहवाल सादर केला जातो, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही भविष्योन्मुख नियोजनासाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्याबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून योग्य धोरण ठरविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय बदल आणि स्त्री-पुरुष समानता यांसारख्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा यंत्रणेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधीमंडळाने वेल्स संसद परिसराची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. या अभ्यासदौऱ्यात दोन महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
वेल्स सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्ट विभागाचे प्रमुख लॉइड हॅरिस यांनी वेल्स सरकार सात प्रमुख उद्दिष्टांनुसार शाश्वत विकासासाठी कशाप्रकारे काम करत आहे याचे सविस्तर सादरीकरण केले.
समृद्धी, आरोग्य, समानता, सामाजिक समन्वय, संस्कृती व भाषा जतन आणि जागतिक उत्तरदायित्व या घटकांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे या सादरीकरणातुन समोर आले.
दुसऱ्या सत्रात फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांनी “Managing Change” या विषयावर मार्गदर्शन केले. सरकार, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून धोरणांची अंमलबजावणी कशी केली जाते, याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. कामगार कल्याण, आरोग्य सुधारणा, अन्नसुरक्षा जनजागृती आणि पुनर्वापर (recycling) उपक्रमांमध्ये वेल्सने साधलेली प्रगती त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमादरम्यान विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सभागृहात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच वेल्स संसद अधिकाऱ्यांनी महाराजांना वंदन केले. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील आमदार आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.











