पुणे, दि. ६ जुलै २०२६ : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोपोडी परिसरातील मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी प्रभाग क्र. ०८ मधील नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी उपमहापौर परशुराम वाडेकर हे गुडघाभर पाण्यात उतरले होते. नदीपात्रात उद्भवलेल्या या या सर्व प्रकाराला नदी सुधार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केला आहे.
या विषयी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे निम्मी बोपोडी पाण्याखाली गेली आहे. पुराचा फटका आदर्श नगर, कोटकर लेन, मंत्री रिवेरा, गोयल-शिंदे पार्क, बोपोडी स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान परिसर, चिखलवाडी आणि पडाळ वसाहत या भागांना बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची वेळ आली. महापालिका प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुढे बोलताना वाडेकर यांनी सांगितले की, नदीवर झालेल्या नवीन पूलांचे काम सुरू असताना निर्माण केलेल्या पर्यायी पूलांचे सांगडे नदीत तसेच आहेत, यामुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे नदी सुधार प्रकल्पाचे अधिकारी गोजारे यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. या बाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केलेले आहेत तरीही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी नदीला पुर आलेला नसतानाही बोपोडी पाण्याखाली गेली आहे.
परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत परशुराम वाडेकर यांच्यासह माजी उपमहापौर सुनीता वाडेका, आनंद छाजेड, नगरसेविका सपना छाजेड, अविनाश कदम, आप्पासाहेब वाडेकर, अविनाश सपकाळ (उपायुक्त, परिमंडळ क्र. ०२, पुणे महानगरपालिका) तसेच विजय नायकल (सहाय्यक आयुक्त, औंध-बोपोडी क्षेत्रीय कार्यालय) यांनी बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य, पाणी उपसा, स्वच्छता, आरोग्यविषयक उपाययोजना तसेच आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, बोपोडी परिसरात उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव आयुक्त नवल किशोर राम यांना करून देण्यात आली आहे. आयुक्तांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला असून उद्या दुपारी यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.



























