पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पुल डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका महिन्याच्या आत दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावर पादचारी क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल उभारणी तसेच अतिक्रमणांवर कारवाई यांसारख्या उपाययोजना पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुल मार्गे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने कोथरुडला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर ना. पाटील यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नागरिकांच्या सूचनांसह पाहणी अहवाल सादर केला. त्यावर आधारित उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेने या परिसरातील जमीन अधिग्रहणासंदर्भात जागामालकांशी चर्चा सुरू केली असून वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
ना. पाटील यांनी या कामाचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश दिले. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरासह इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणीही कठोर उपाययोजना करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले.
वाहतूक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून ३० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देत, आवश्यकतेनुसार आणखी २५० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही ना. पाटील यांनी दिली.



























