मुंढर दि. २४ :- पर्यावरण संवर्धनाची जनजागृती आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी तसेच वातावरणात होत असलेले परिणाम व त्याचे मानवी शरीरावर व इतर प्राण्यांवर होत असलेले विघातक परिणाम व कमी पर्जन्यमान या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत मुंढरच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मुंढर क्रमांक १ येथे ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. सदर प्रसंगी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, घटते पर्जन्यमान तसेच पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेऊन जिल्हा परिषद रत्नागिरीने ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या प्रेमाने आपण आपल्या मुलांचे संगोपन करतो, त्याच जिव्हाळ्याने प्रत्येकाने एका वृक्षाचे संगोपन करावे, या सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर प्रसंगी ग्रामपंचायत मुंढरने सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून सुमारे २०० वृक्षांची रोपे उपलब्ध करून घेतली असून गावातील वृक्षारोपणासाठी इच्छुक ग्रामस्थांना ती विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत. उपलब्ध रोपांमध्ये खैर, जांभूळ, कांचन यांसह विविध प्रजातींचा समावेश आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमास ग्रामपंचायत मुंढर-कातकरीच्या प्रशासक आमिषा गमरे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी शिर्के, मुख्याध्यापक दशरथ कदम, बाणे सर, प्रभाकर चव्हाण, रसिका शिर्के, साक्षी लांजेकर, अथर्व कांबळे, रोहन गुजले, वैभव माळी, कृषी महाविद्यालय खरवतेचे कृषी मित्र, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























